
‘निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’
वर्षानुवर्षाचे हे बालगीत म्हणताना मामाचा तो चिरेबंदी वाडा कायमच सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि बऱ्याच जणांच्या मनात घर करून बसलेला वाडा जुन्या आठवणी ताज्या करतो. पण हल्लीच्या नवीन पिढीला या बालगीतातून वाडा म्हणजे काय निदान ते तरी समजावून सांगता येईल?
तसं ‘वाडा’ म्हंटल की आठवतं ते पुणे.. आणि ‘पुण्याचे वाडे’ किंवा ‘वाड्यांचे पुणे’..! काहीही म्हंटल तरी हे वाडे काही आठवणीतून जात नाहीत. हो, आठवणीतून असेच म्हणायला लागेल कारण आता हे वाडे आहेत कुठे? ‘वाड्यांचे’ असलेले पुणे हे आता ‘फ्लॅटचे’ झालेले आहे.
पेशावाईपासून वाडा या संस्कृतीला विशेष महत्व आले. पेशवे आणि त्यांचे आप्तेष्ट यांनी नाशिक, सातारा, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाडे बांधले. फार वर्षांपासून वाडा हे पुण्याचे वैभव होते आणि त्यातील अनेक वाडे प्रसिद्ध होते. आता आपल्या शनिवारवाडा किंवा विश्रामबागवाड्याचेच उदाहरण घ्या ना..! दिसायला इतके भव्य, सुंदर आणि तसेच मजबूतही.. या वाड्यांची रचनाच इतकी वेगळी होती की प्रत्येक गोष्टीचा विचार त्यात आपल्याला केलेला दिसतो. खालच्या बाजूला तळमजले आणि त्यावर आणखी एक मजला आणि मध्यभागी भलेमोठे मैदान, त्याच्याच एका बाजूला पाण्याचा हौद आणि असेच मध्यभागी या वाड्याचा मोठा लाकडी दरवाजा असायचा आणि तो लावायला एक लाकडी अडसर बस एवढचं किंवा अगदीच असलं तर एखादं कुलूप. आणि आत गेल्यावर आतले वातावरण पवित्र करणारे तुळशी वृंदावन. काहींचे स्वतःचे स्वतंत्र असे भव्य वाडे असत. त्यातही प्रत्येकाच्या भल्या मोठ्या खोल्या, दिवाणखाना आणि तिथला झोपाळा तसेच माडीवर जाणारा लाकडी जिना.. शिवाय वाड्यामागे गुरांचा गोठा आणि पुढे छोटी बाग असे स्वरूप असे.
वाडे हे खरं तर एखाद्या कुटुंबाची ओळख होती. लोकं फक्त वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होती पण ते एक कुटुंबच होतं. जे काही करायचं ते सगळ्यांनी मिळूनच असा वाड्याचा जणू एक पायंडाच होता. सर्वांनी मिळून रेडीओवर क्रिकेटची लाइव्ह कॉमेंटरी ऐकायची आणि त्यावर कल्ला करायचा, तिथल्या नळावर पाणी भरायच्या वेळी होणारी स्त्रियांची भांडणे, रुसवे- फुगवे आणि तरी पुन्हा एकत्र येऊन मंगळागौरी, भोंडला असे सण साजरे करायचे. दिवाळी म्हणजे एक मोठा सोहळाच असायचा, ६०-७० दिवे तेवल्यावर वाडा असा काही लखलखत असायचा की ते दृश्य केवळ अवर्णनीय.. ! शेजारणीने केलेल्या पदार्थांची देवाणघेवाण, उन्हाळ्यातली वाळवणे हे सारे ठरलेले होते. तसेच लहान मुलेही खेळण्यात इतकी रममाण होत कि त्यांना कशाचेच भान राहत नसे. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या रिकाम्या पटांगणात गोट्या, लंगडी, लपंडाव, क्रिकेट यांमध्ये तासन् तास जायचे. भातुकली, सागरगोटे, लगोऱ्या असे काही खेळ मुली दुपारच्या वेळेत खेळत असायच्या. काही पुरुष मंडळी राजकारणाच्या चर्चा किंवा पत्ते खेळण्यात दंग असायचे. हे सगळं वातावरण अगदी सरळमार्गी आणि जिव्हाळ्याचे होते.
या वाड्यात अनेक जणांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. वाड्यामध्ये खरा अनुभव यायचा तो प्रत्येकातल्या माणुसकीचा. कोणी गावाला निघाले, की घराच्या किल्ल्या शेजारीच देत. एकमेकांच्या सुखदु:खात सारा वाडा सहभागी असायचा. भीती नावाची गोष्टच नव्हती. त्यामुळे कोणाच्या घरातील कोणी आजारी पडले की, बाकी सारे मदतीला धावून जात. कोणाच्या घरात लग्न निघाले की सांडग्यांपासून ते लग्नानंतरच्या सत्यनारायणापर्यंतची सारी जबाबदारी वाडय़ातील मंडळी हौसेने उचलत. तेव्हा वाटे, की हे साऱ्या वाडय़ाचेच कार्य आहे.पुणेकरांची खरी ओळख वाडा हीच होती. पण एकात्मतेचे आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेले वाडे आता नामशेष होत चालले आहेत. आपल्या पुढील पिढीला वाडा संस्कृती काय होती हे समजण्याएवढेही वाडे आता शिल्लक नाहीत. हातावर मोजण्याइतपत वाडे आता हे पुण्यातल्या पेठांमध्ये दिसत आहेत. अर्थात शहरातील बहुतांश वाडे अजूनही जुन्या जमान्याची साक्ष देत आहेत. काहींचे बाहेरून तर काहींचे आतून आधुनिकीकरण झाले आहे. काही वाडे पाडून आता तिथे बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. बहुतकरून वाड्यांची स्थिती ही गंभीर आहे कारण त्याची डागडुजी करायला कोणी तयार नसते. वाड्यांच्या मालकांना तर इमारतीतून मिळणाऱ्या पैशाचे आकर्षणच जास्त आहे. ५०-६० वर्षापूर्वी बांधलेल्या भक्कम वाड्यांचे आयुष्यही आता तसे संपत आले आहे. काही वाडे पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे खर्च केला तरी ते पुन्हा बांधण्याच्या स्थितीतही नाहीत पण सध्या तरी सुस्थितीत असलेल्या वाड्यांचे जतन करणे हे आपल्याच हातात आहे.