
21व्या शतकातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आविष्कार आपण आता रोजच अनुभवतो. मोबाइल हा त्यातलाच एक. प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक. जणू काही आपला एक अवयवच. बोलण्यासाठी आणि बोलणं टाळण्यासाठी हमखास उपयोगी पडणारं एक साधन.
सध्याच युग धकाधकीचं, धावपळीचं आणि गतिमान आयुष्याचं आहे. मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, इतकच नव्हे तर घरातल्या व्यक्तींच्याही एकमेकांशी भेटी होणं कमी होत चाललय. सुखं-दु:खाच्या गप्पा एकत्र बसून होणं तर दूरच. ह्याला कारण आपली बदलती जीवनशैली. टीव्ही वरच्या न संपणार्या ठराविक मालिका, दिवसभर त्याच त्याच सांगितल्या जाणार्या बातम्या आणि क्रिकेट / फुटबॉलचे ( फिक्स ) सामने ह्यांना फारसे पर्याय नाहीत. एक अपवाद म्हणजे ‘मोबाइल’.
पण ‘मोबाइलवर बोलणं’, हे कॉल कोण करतं त्यावर अवलंबून असतं. आपण कॉल केला तर पलीकडे बोलणार्यांची रांगच तयार असते, विषय तयार असतात. बोलण्यात आपलेपणा, मायेची ऊब व प्रेमाचा ओलावा वगैरे सर्व काही असतं ह्याउलट आपण जेंव्हा समोरच्याचा कॉल घेतो तेंव्हा पलिकडची व्यक्ति घाईत असते, एकतर मोजक्या शब्दात संवाद साधते, विचार वा भावना व्यक्त करते. आणि नेमकं त्याचवेळी त्यांचं नेटवर्क जातं किंवा ‘आपला आवाज फाटतोय’ असं समोरच्याला वाटतं. मध्येच त्यांच्या दुसर्या फोनवर किंवा मोबाईलवर नेमका कोणाचातरी त्यांना कॉल येतो. अगदीच नाही तर ‘लाइनच’ कट होते. शेवटी काय आहे? आहो शेवटीही आणि आधीही “महाघाई” आहे, अन हो , “महागाई” ही आहे.
‘महागाई’मुळे प्रत्येक वस्तूचा ‘दर’,
गगनाला भिडला आहे |
‘सुपारी’चा भाव देखिल,
‘लाखा’पर्यन्त चढला आहे ||
मग महिन्याची येणारी प्रचंड बिलं भरतांना आपल्यालाही अगदी भरून येतं. ह्या बिलांवरून आठवलं, लाईट बील, फोन बील, मोबाइल बील सोसायटी बील आणि विलंब होत असलेलं एक नवं बील ……….
देणार्याचे हात ‘हजार-रे’ ,
म्हणूनच सर्वत्र भ्रष्ट ‘रोख’पाल |
घेणार्यांना रंगेहात पकडण्यास,
आता अण्णा हजारेंचे — “लोकपाल’ ||
या मोबाईलचा एक उपयोग मात्र नक्कीच होतो. प्रत्यक्ष कॉल न करता नुसत्या एका मिस कॉलने एकमेकांना ‘गुड नाईट’ वा ‘गुड मॉर्निंग’ करता येतं, एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर एक मिस कॉल तो निरोप देऊ शकतो आणि तो कॉल मिस झालेला नाही ह्याची , समोरचा एक मिस कॉल करून पोहोचपावती देतो.म्हणूनच मोबाईल हा बहुतेकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे.